Post Office Schemes : 5 लाखाचे 10 तर 10 लाखाचे मिळणार 20 लाख, सरकारची ‘ही’ योजना देणार थेट दुप्पट रिटर्न्स !
Post Office Schemes : पोस्ट ऑफिसच्या अशा काही योजना आहेत, ज्या तुम्हाला गॅरंटीड रिटर्न्सची हमी देतात. काही योजनांच्या माध्यमातून खातेदाराला पेन्शन दिले जाते. सध्या मात्र पोस्ट ऑफिसच्या एका आगळ्या-वेगळ्या योजनेची चर्चा होत आहे. या योजनेत तुम्ही गुंतवलेले पैसे थेट दुप्पट होतात. विशेष म्हणजे ही रक्कम दुप्पट करण्याची हमी सरकार घेते. याच कारणामुळे या योजनेअंतर्गत खाते खोलणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे ही योजने नेमकी काय आहे? या योजनेचे महत्त्व काय आहे? तुम्ही गुंतवलेले पैसे या योजनेत डबल कसे होतात? हे जाणून घेऊ या..
पोस्ट ऑफिसच्या या आगळ्यावेगळ्या योजनेचे नाव किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra- KVP) असे आहे. ही एक गॅरंटिड रिटर्न्स देणारी योजना आहे. भारताचा कोणताही नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतो. विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत खाते खोलणे फार किचकट किंवा अघड नाहीये.
पैसे दुप्पट होण्याची हमी
किसान विकास पत्र या योजनेअंतर्गत तुम्ही गुंतवलेली रक्कम थेट दुप्पट होते. तशी गॅरंटी सरकारकडून दिली जाते. समजा तुम्ही या योजनेत 5 लाख रुपये ठेवले तर त्याचे तुम्हाला 10 लाख रुपये मिळतील. तुम्ही समजा 10 लाख रुपये ठेवले तर तुम्हाला 20 लाख रुपये दिले जातील. मात्र या योजनेच्या काही अटीदेखील आहेत. या सर्व अटी पूर्ण केल्यानंतरच तुम्हाला योजनेचा लाभ मिळू शकतो. किसान विकास पत्र या योजनेतून दुप्पट परतावा हवा असेल तर त्यासाठी तुम्हाला रक्कम 115 (9 वर्षे, 7 महिने) महिन्यांसाठी ठेवावी लागेल. म्हणजेच तुमचे पैसे हे 115 महिन्यांनी दुप्पट होतील. या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर 7.5 टक्के रिटर्न्स दिले जातात. Post Office Schemes